दलालांच्या जाळ्यातला शेतकरी
उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी,
घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी;
तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो,
नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो.
खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती,
आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी;
पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो,
त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो.
"यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा,
कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा;
पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं,
भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं.
शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी,
पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी;
कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं,
त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं.
कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन,
आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून;
अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं,
आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं...
म्हणतात शासनाने दिलं बरंच काही,
पण त्याच्या हाती काहीच आलं नाही;
सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं,
आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं.
आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साधू,
भुलवून जनतेला करताहेत स्वतःचं राज्य;
सत्य हरवतंय, अन्याय वाढतोय रोज,
आणि शेतकरी मात्र हरवतोय हेच आहे आजचं ओझं.
सुदाम मदगे (किवळे, मावळ, पुणे)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा