अंधार
अहो, आता कुठेतरी गावाला, वाड्या-पाड्याला कच्चा रस्ता आला; एक-दोन बल्ब लागले; चार-पाच खांब उभे राहिले. नाहीतर आमचं आयुष्य आयुष्यभर अंधारातच गेलं असतं. आम्ही जंगलात राहणारे, डोंगरदऱ्यांत वसलेले. आमच्या जमिनीतून, डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याने नद्या भरल्या आणि तेच पाणी पुढे शहरांपर्यंत पोहोचून तुमचं जेवण झालं. आम्ही झाडं जगवली, जंगलाचं रक्षण केलं. त्यामुळेच हवा मिळाली, जीवन मिळालं. गावातली माणसं बॅटरी नसताना, त्या काळात खंदील घेऊन, रॉकेलच्या थेंबावर रात्री इकडे-तिकडे फिरायची. गोठ्यात, घरात साप फिरायचे; जंगलात जंगली जनावरं फिरायची; पण कसलीही भीती नव्हती. सर्व देवांवर विश्वास ठेवून मंडळी जगायची. रात्रीच्या अंधारात जत्रेला जायचो, जीवनाचा आनंद घ्यायचो. आम्ही गरीब माणसं होतो, पण देशासाठी महान होतो. तरीसुद्धा आमची दखल कुणीच घेतली नाही. आंध्रात एका मुलाने रॉकेलच्या बाटलीच्या उजेडात अभ्यास केला होता. तो दहावी पास झाला. देशाच्या सीमेवर सेवेसाठी, बॉर्डर प्रोटेक्शन फोर्समध्ये आमच्या तालुक्यातल्या तानाजी नावाच्या मुलाची निवड झाली. आख्या गावात आनंद उसळला. “देशासाठी आपला मुलगा गेला” याचा अभिमान होता...