आजच्या गावांची दैन्यावस्था
साधारण 80 ते 90 च्या दशकात गावाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसत. बैलगाडीचा प्रवास हाच एकमेव आधार होता. गावात एक दोन जणांकडेच फक्त सायकली असायच्या. देव धर्माला किंवा लग्नकार्याला जायचे असेल तर लोक भल्या पहाटे बैलगाडी जुंपून निघत असत. बैलगाड्या घेऊन डोंगर दर्या ओलांडून लोक इच्छित स्थळी जात असत. भर दुपारी निवांत एका झाडाखाली बसून बैलगाडीचे बैल सोडून झाला झाडाखाली बांधत. त्यांना आणलेली वैरण खायला घातलेली असे. जवळच झाडाखाली बैलगाडीतून आलेले लोक पंगतीने घरी होऊन आणलेले जेवण करत. बैल सुद्धा वैरण खाऊन पाणी पिऊन रवंत करीत असत. आणि मग थोड्या वेळाने परत गाडी जुंपून लोक पुढच्या प्रवासाला निघत. असा तो काळ होता. एकमेकाकडे पाहुणे म्हणून जायचे असेल तर लोक शक्यतो पायीच प्रवास करायचे. पाहुणा आल्यावर घरातील सदस्यांना खूप आनंद व्हायचा. पाहुणे आल्यावर घराच्या ओटीवर घोंगडी अंथरली जायची. घोंगडीवर बसण्याची मजा वेगळीच होती. घोंगडी वर बसून पितळीतील गुळाचा चहा पिताना एक वेगळाच आनंद व्हायचा. पाहुणा आला म्हणजे चांगल्या प्रकारे उठबस व्हायची. आजूबाजूची माणसं विचारपूस करायची. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. त्यामुळे आजूबा...