🌳 जंगलातील आग
मनुष्य कुटुंबामध्ये सुख–समृद्धी चालू असते, सर्वत्र आनंद असतो. मग ते मनुष्य असोत, प्राणी असोत किंवा पशुपक्षी प्रत्येक जीव सुखी आणि आनंदी राहावा हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. आपल्याला जसा जीव प्रिय आहे, तसाच प्रत्येक प्राण्यालाही त्याचा जीव प्रिय असतो. आमची आजी आम्हाला नेहमी सांगायची, “ताटातील भाकरीचा तुकडा जेवताना आपल्याकडे पाहत असलेल्या कुत्र्याला टाकायलाच हवा.” जुन्या लोकांची ही शिकवण माणुसकीची होती. बैल काम करत असताना त्याला मारू नका, त्याला चारा–वैरण द्या. गाई–म्हशींची सेवा करा. गोरगरिबांना मदत करा. उगाच अहंकार करू नका. खोटं नाटक करू नका. कष्टाने जे मिळेल त्यात समाधान मानून जगा अशी शिकवण आपल्याला पूर्वजांनी दिली आहे. आपल्याला पाणी मिळते ते पावसामुळे. पाऊस कधीच आपल्याकडे त्याच्या पाण्याचे पैसे मागत नाही. तो चार महिने मनसोक्त बरसतो, नद्या–नाले वाहू लागतात आणि आपल्याला जीवन देतात. त्याच्या प्रेमाचा वर्षाव कधीच कमी पडत नाही. जमीन ही आपली माता आहे. आपले पंजोबा–खापर पंजोबा सांगून गेले “पोरा, जमिनीचा तुकडा विकू नको. तिची मशागत कर, तिची जोपासना कर. तीच तुझी लक्ष्मी आहे, उदरनिर्वाह द...