आंबे-करवंद घ्या
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत. आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो. त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो. जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो. कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो. एकदा तळ...