जीवन आदिवासी जमातीचे
जीवन जगणाऱ्या जमाती जल, जंगल आणि जमीन यांचे खरे वारसदार पूर्वीपासून डोंगरदऱ्यांमध्ये राहत आले. आजही त्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट, त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणांवरून हलवून पुन्हा त्याच डोंगरदऱ्यांमध्ये ढकलले जात आहे. हा अन्याय किती काळ चालणार?
स्वतंत्र विभाग, योजना, घोषणा हे सगळं कागदावर आहे. पण प्रत्यक्षात मात्र काहीच बदल दिसत नाही. वास्तव इतकं कटू आहे की ते सांगताना मन सुन्न होतं.
शंकराची कहाणी – श्रमाचा अपमान
“शंकरा, तुझी बायको-पोरं उपाशी आहेत ना? मग ये इथे काम कर…” शंकर दिवसभर उन्हात काम करतो. पाण्याचा घोट घेऊन, उपाशीपोटी काम पूर्ण करतो. संध्याकाळी मजुरी मागतो—
“शेठ, माझे पैसे द्या…”
पण उत्तर मिळतं “तुला एवढंच काम सांगितलं होतं… हे घे ५० रुपये आणि निघ!”
दोनशे रुपयांच्या कामाचे फक्त पन्नास रुपये. विरोध केला तर शिवीगाळ, मारझोड. तरीही शंकर ते पैसे घेऊन घरी जातो… कारण पोरं उपाशी असतात.
गंग्याची मुलगी – असुरक्षिततेची वेदना
“गंग्या, तुझी मुलगी मोठी झाली ना? पाठव कामाला… थोडं हातभार लागेल.”
गरीबीमुळे गंग्या तयार होतो. मुलगी कामासाठी वाड्यावर जाते. पण तिथे तिच्यावर पडणाऱ्या नजरा… आणि नंतर जे घडतं ते शब्दात मांडणंही कठीण आहे
दररोजची झुंज
“आम्ही जंगलची पाखरं… फुलं वेचतो, गवत विकतो… जे मिळेल त्यातून दिवस काढतो.”
हा त्यांचा दिनक्रम. रोजचा संघर्ष. उद्याची काहीच खात्री नाही.
शासन म्हणतं विकास होतोय. पण
अजूनही रस्ते नाहीत
पिण्याचं पाणी नाही
शाळा, आरोग्य सुविधा अपुऱ्या
डोंगरदऱ्यांतील लोकांना बाहेरच्या जगात काय चाललंय, हेही माहिती नसतं.
राजकारण आणि भीती
गावात निवडणुकीची सभा होते. दत्त्या आवाज उठवतो “आम्हाला काहीच सोय नाही, आम्ही मत देणार नाही!”
पण नंतर त्याला बाजूला नेऊन मारहाण केली जाते. आवाज दाबला जातो.
शिक्षण आणि कर्जाचा सापळा
एका वडिलांना सांगितलं जातं “पोराला शिकव… मोठा होईल.”
त्यासाठी कर्ज घेतलं जातं. पण वेळेवर पैसे न भरल्याने व्याज वाढतं आणि शेवटी जमीनच जप्त होते.
वास्तवाचा निष्कर्ष
आजही या जमातींचा फक्त ५ ते ७ टक्के विकास झाला आहे. उरलेले लोक अजूनही भीती, गरिबी आणि अन्यायात जगत आहेत.
चासकमान धरण परिसरातील गावे घोटवडी, शेंदूर्ली आणि इतर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. योजना आहेत, विभाग आहेत, पण पैसा कुठे जातो याचा हिशोब नाही.
“आम्ही या देशासाठी जंगल जपलं, पाणी दिलं, निसर्ग वाचवला… पण आम्हालाच विसरलं गेलं.”
आता वेळ आली आहे
जागरूक होण्याची
अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची
हक्कासाठी लढण्याची
धन्यवाद!
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा